"वर्तमानपत्रे बंद झाली तर" कल्पनात्मक मराठी निबंध
"वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.
वर्तमानपत्रे बंद झाली तर.... वर्तमानपत्रे नसती तर...
दररोज सकाळी सहा-सव्वासहा वाजता 'पेपर' असा आवाज येतो आणि पटकन मी दरवाजा उघडून वर्तमानपत्र घेऊन वाचत बसतो. जगभरातल्या घडामोडी घरबसल्या समजतात परंतु आज पेपरवाला आलाच नाही. तास, दोन तास वाट पाहिली अगदी बेचैन झालो. वर्तमानपत्र वाचनाची इतकी सवय झाली होती की, ते वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाचनाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आज पेपर न आल्यामुळे माझ्या मनात क्षणभर एक विचार आला की ही वर्तमानपत्रे बंद झाली तर .... बापरे! ही कल्पनाच करवत नाही. वर्तमान पत्रे बंद झाली तर आपल्या देशात, राज्यात, शहरात घडलेल्या घडामोडी, त्यांचे बरे-वाईट परिणाम समजणार नाहीत, कोणतीही माहिती मिळणार नाही.
आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा वृत्तपत्रांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळात जनतेत सामाजिक आणि राजकीय जागृती निर्माण करण्याचे कार्य वृत्तपत्रांनी केले आहे. वृत्तपत्रे हे लोकशिक्षणाचे महत्त्वाचे माध्यम आहे. वृत्तपत्रामधून देशातील तसेच परदेशातील विचारांचा प्रसार केला जातो. भारतामध्ये सुरुवातीला इंग्रजांसाठी इंग्रजांकडून वृत्तपत्रे काढली जात होती. त्यात भारतीय प्रश्नांना जागा नव्हती. भारतात इ. स. १७८० मध्ये जेम्स ऑगस्टस यांनी बेंगॉल गॅझेट हे पहिले वृत्तपत्र काढले. याशिवाय संवाद कौमुदी, यंग इंडिया, वंदे मातरम्ही वृत्तपत्रे भारतात निघाली. सुधारणा व्हावी, समाजातील वाईट चालीरीती, परंपरांचा दोष कमी करावा, राष्ट्रवादी भावना निर्माण व्हावी म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतून 'दर्पण' हे साप्ताहिक सुरू केले. भाऊ महाजन यांच्या 'प्रभाकर' मधून लोकहितवादी यांची धार्मिक शतपत्रे प्रसिद्ध झाली. त्यातून विविध प्रश्न मांडून जनजागृती केली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,' 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय'? असे अग्रलेख टिळकांनी 'केसरी'तून लिहून जनजागृती केली. वृत्तपत्रे ही समाजमनाचा आरसा असतात. समाजमनाचे प्रतिबिंब त्यावर उमटलेले असते आणि अशा विचारांची प्रेरणास्थान असलेली वृत्तपत्रे बंद झाली तर अशी परिवर्तनाची, बदलाची अपेक्षा लोकांनी करू नये.
लोकशाहीला यश आणण्यात शासनाची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात वृत्तपत्रांची भूमिका फार महत्त्वाची असते. सकाळ, केसरी, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, सामना, लोकसत्ता, अशा विविध वृत्तपत्रांतून सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यावसायिक माहिती घराघरात पोहोचविता येते. ज्ञान प्रसार करण्यासाठी, व्यावसायिक अभिवृध्दीसाठीच्या जाहिराती, ज्ञान-मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे स्थळ-वेळ यांची माहिती मिळवण्यासाठी वृत्तपत्राची आवश्यकता असते. वृत्तपत्रातून भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचारांच्या बातम्यांतून प्रतिकार करण्याची प्रेरणा मिळते. नीतिमूल्यांवर आधारित संस्कारकथा, सामान्यज्ञान, मनोरंजक माहिती, शब्दकोडे, प्रश्नमंजुषा, विनोद, क्रीडाविश्व असा माहितीचा खजिना आमच्यासमोर आलाच नसता जर वृत्तपत्रे नसती तर.
वृत्तपत्रातून वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला, वादविवाद, रंगभरण, रांगोळी अशा स्पर्धांची माहिती मिळते. त्यातूनच आपल्या कलागुणांना वाव मिळतो. वृत्तपत्रातून आपण मिळविलेल्या यशाची बातमी आली, आपले नाव आले तर आपल्या आनंदाला पारावार राहात नाही. नावलौकिक मिळतो तो वृत्तपत्रातून. अन्यथा इतरांना आपल्या कार्याची, आपल्या यशाची माहिती मिळाली नसती. अशा प्रकारे वृत्तपत्रे प्रेरणा देण्याचे कार्य करतात. माझी कथा, कविता, एखादा चुटकुला वृत्तपत्रात आला की मी सर्वांना सांगत सुटतो हे पाहा, माझे नाव, माझी कविता. वृत्तपत्रे नसती तर मला असा आनंद मिळाला नसता. नैसर्गिक आपत्ती भूकंप, महापूर वगैरेची दाहकता वर्तमानपत्रातून सचित्र वाचता येते, पाहता येते. त्यामुळे परिस्थितीची जाणीव निर्माण होते. सहकार्याची भावना, सहानुभूती, संवेदनशीलता ही मूल्ये वाचकांच्या मनात निर्माण होतात. मदतीचा ओघ सुरू होतो. वृत्तपत्रे नसती तर या गोष्टी घडल्या नसत्या.
-समाप्त-
मित्रांनो "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.
!! धन्यवाद !!
Also read :
Comments
Post a comment