"शेतकऱ्याची आत्मकथा" आत्मकथनात्मक मराठी निबंध
"शेतकऱ्याची आत्मकथा" हा एक आत्मकथनात्मक निबंध आहे. वर्णनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या घडलेल्या गोष्टीचे वर्णन करायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला "शेतकऱ्याची आत्मकथा" हा निबंध आत्मकथनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.
शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
सुट्टीत गावाकडे, खेडेगावी जाण्याचा योग आला. आई, बाबा आम्ही सर्वजण मामाच्या गावी गेलो. माझा मामा जसा शेतकरी आहे, तसेच बहुसंख्य लोक शेतीवरच आपले जीवन कंठत आहे. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे पूर हे मला फक्त वर्तमानपत्रात वाचून माहित होते. परंतु या संकटाचा आणि निसर्गातील बदलांचा किती मोठा परिणाम शेतकऱ्यावर होतो याची जाणीव गणपाकाकाच्या मनोगतातूनच झाली.
संध्याकाळची वेळ होती. शेताकडे जाण्यासाठी मी निघालो असताना शेतीच्या बांधावर बसलेले काका मला दिसले आणि मी थोड्याशा गप्पा मारण्यासाठी त्यांच्याजवळ जाऊन बसलो तर त्यांनी आपली आत्मकथा सांगितली. ते म्हणाले, अरे बाळा तू शहरात राहतो. खेडेगाव, आमची शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न तुला माहित नसतील. भारत आपला देश शेतीप्रधान आहे. भारत शेतकीचा देश आहे. येथील ८० टक्के लोकांचे जीवन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शेतीवर अवलंबून आहे. काळ्या मातीत मोती पिकवून लोकांना अन्नपुरवठा करणारा शेतकरी या जगाचा दाता आहे. शेतकऱ्याला आपल्या देशात खूप महत्त्व आहे. म्हणूनच मा.लालबहादुर शास्त्री यांनी “जय जवान जय किसान' म्हणून त्यांचा गौरव केला. ऊन, वारा, थंडी, पाऊस यांचा कसलाही विचार न करता शेतीत राबराब राबणारे आम्ही शेतकरी, खरे आम्हीच या धरतीमातेचे सेवक, या काळ्या आईचे सुपुत्र परंतु आज आम्हालाही अनंत संकटांना तोंड द्यावे लागत आहेत.
सध्या पावसाचे स्वरूप अनियमित आहे म्हणून बोअर मारावं म्हटलं तर भूजलाची पातळी खाली गेली आहे. पाणी लागलं तर नशीब. थोडाफार पैसा आहे, उत्पन्न थोडे बरे आहे, म्हणून असे प्रयत्न करतो परंतु ज्यांच्याकडे भांडवल नाही, पैसा नाही अश्या शेतकऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मुलभूत गरजासुध्दा त्यांच्या भागत नाहीत. चटणी, भाकरी खाऊन झोपडीत जगावं म्हटलं तर दुष्काळानं हातपाय हलवताच येईना. शेतमाल पिकल्यानंतर शेतीतून माल बाजारपेठेत नेण्यासाठी व्यापारी, दलाल यांचा वाटा, माल नेण्याचा खर्च आणि योग्य किंमत न आल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. कर्जबाजारीपणा वाढला आहे. प्रत्येक पिकासाठी खते, बी-बियाणे, फवारण्या, नांगरणी, कोळपणी खूप खर्च करावा लागतो, परंतु उत्पन्न काढूनही म्हणावा तितका फायदा होत नाही. म्हणून मी सगळी पिकं सोडून ऊस लावला आहे.
सध्या उसाचं प्रकरण साऱ्या महाराष्ट्रात गाजत असताना माझा पण ऊस तसाच पडून आहे. उसाचं गाळप करावं तर चुलवण नाही, खर्च झेपत नाही कारण ते परवडत नाही आणि कारखान्याला घालावं म्हटलं तर कारखान्यात ऊसच ऊस पडून आहे. काय करावं तेच समजत नाही.
शेतात काम करणारा गडी, त्याचा पगार, गायी, बैल, म्हशी यांच्यासाठी चारापाणी, बैल बारदाना याच्यासाठीचा खर्च आता भागत नाही. सध्या महागाईपण खूप वाढली आहे. मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न, सण, वार, पाहुणा रावळा यामुळे एक झालं की एक खर्च समोर येतं. सुरुवातीला शेतीत झुळझुळणारं खळाळणारं पाणी होतं, धान्याच्या राशीच्याराशी घरी यायच्या परंतु आता
"आभाळ फाटलं, बांध फुटलं
पाणी बघून डोळ्यात पाणी आलं"
अशा बळीराजाला योग्य न्याय मिळावा, सुखाचे चार घास मिळावेत हीच अपेक्षा आहे' गणपा काकांच्या, मनोगतातून गांधीजींनी जे सांगितलं होतं, आपला खरा भारत पाहायचा असेल तर “खेड्याकडे चला' खेडेगाव आणि शेतकरी हा भारताचा आत्मा आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आधार आहे हेच खरे.
-समाप्त-
मित्रांनो "शेतकऱ्याची आत्मकथा" या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.
!! धन्यवाद !!
Also read :
Comments
Post a comment